मुंबई : Sanjay Raut on Eknath Shinde Not Reachable : शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. शिवसैनिक हा निष्ठावंत आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेलं आहे. अनेक आमदारांशी आमचा संपर्क झालेला आहे. एकनाथ  शिंदे यांच्याशीदेखील बोलणं झालेलं आहे. भूकंपाची भाषा कोण करत असेल तर त्यांनी शिवसेनेशी लढावं लागेल. जे बाहेर आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. राजकारणात अशा प्रसंगाना सामोरं जावं लागते, अशी प्रतिक्रिया सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे राऊत म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामकाज करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आढावा घेत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्याशी बोलणे सुरुच आहे. आमची चर्ची सुरु आहे. राजकारणात अशा प्रसंगाना सामोरं जाव लागत असते. काही लोक अफवा पसरवत आहेत. काहीही होणार नाही. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेले आहे. त्यामुळे काहीही धोका नाही, असे राऊत म्हणाले.


दरम्यान, एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूरतच्या द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये काही आमदारांची बैठक झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह द ग्रँड भगवतीमध्ये शिवसेनेचे 21 आमदार असल्याची माहिती आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे. एकनाथ शिंदे यांची गुजरात प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी रात्रीच भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना आमदार मंत्री तानाजी सावंतही नॉट रिचेबल असल्याची माहिती उघड होत आहे. 



शिवसेनेचे 21 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईच स्वतः शिंदे यांच्यासह नॉटरिचेबल आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तीन मंत्री शिंदे यांच्यासह गायब आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे मंत्री संदीपान भुमरे हेही शिंदे यांच्यासह नॉट रिचेबल आहेत. यात शिवसेनेचे वजनदार आमदार रात्रीपासूनच नॉटरिचेबल आहेत. 


ठाण्याचे प्रताप सरनाईक, अंबरनाथचे बालाजी किणीकर, पालघरचे श्रीनिवास वनगा, भिवंडीचे शांताराम मोरे, बोरिवलीचे प्रकाश सुर्वे, कल्याणचे विश्वनाथ भोईर गायब आहेत. त्याशिवाय यवतमाळचे माजी मंत्री संजय राठोडही गायब आहे. रायगड जिल्ह्यातलेही शिवसेनेचे तीन आमदार नॉटरिचेबल आहेत.