मुंबई : कोरोनाचा संकट वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच संचारबंदीही लागू आहे. असे असताना मुंबई - खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्यासाठी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम १८८ अन्वये देशव्यापी लॉकडाऊनमुळे जारी केलेल्या कलम १४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाव्हायरस काळात प्रवास करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी परवानगी देऊन लॉकडाऊन काळात वाधवान यांना मदत केल्याप्रकरणी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएचएफएल कंपनी आणि येस बँक फसवणूक प्रकरणात जामिनावर असलेल्या बंधू धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांनी कुटुंबाच्या आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून खंडाळ्याहून महाबळेश्वरकडे जाण्यास परवानगी मिळाली होती. मात्र, चौकशीत काही बाब उघड झाली आहे. अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे संचारबंदीच्या कलम १४४चा भंग केला आहे. तसेच लॉकडाऊन काळात जारी करण्यात आलेले कलम १८८चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



येस बँकेच्या फसवणुकीप्रकरणी वाधवान भावांविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस बजावली आहे. असे असताना गुप्ता यांनी परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व  २३ सदस्यांना सेंट झेवियर्स हायस्कूलमधील अलग ठेवण्याचा विचारही होता.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर जाहीर केले. तर त्याच्याविरुद्ध चौकशीही सुरु केली आहे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत तो रजेवर राहील.