Accident News : एकीकडे सगळीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली जातेय. तर दुसरीकडे वर्षाचा शेवटचा दिवसही अनेकांसाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरतोय. वर्षाच्या शेवटी झालेल्या पाच विविध अपघातात 16 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर 68 जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद आणि शिर्डीसाठी सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात बारामतीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीच्या सांगवी रस्त्यावर या सहलीच्या बसला गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील इचकरंजीतील सागर क्लासेसची आठवी ते दहावीच्या मुलींची सहल औरंगाबाद आणि शिर्डी येथे गेली होती. मात्र शिर्डी येथून इचलकरंजी येथे परतत असताना यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसला बारामतीमधील पाहुणेवाडी गावच्या हद्दीत अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ तर 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या सहलीसाठी एकूण 48 मुली व 5 शिक्षक गेले होते. सध्या जखमींवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कार आणि बसच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू


दुसरीकडे गुजरातमध्येही गंभीर अपघात झालाय. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं गुजरातच्या नवसारीमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला. वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय. तर 30 जण गंभीर जखमी झालेत. ही बस अहमदाबादहून मुंबईला जात होती. नवसारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ मदत पोहोचवली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली आहे.


नंदुरबारमध्ये पिकअप उलटला


नंदुरबारच्या खोकसा घाटात पिकअप गाडी उलटल्याने दोन मजूरांचा मृत्यू झालाय. तर 11 जण जखमी झालेत. हे मजूर धुळे जिल्ह्यातील उमरपाटा गावाला जात होते. कामावरून परतत असताना हा अपघात झाला. मजुरांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


बाईस्वाराचा ट्रकखाली येऊन मृत्यू


पुणे बंगळुरु महामार्गावर वारजे पुलावर झालेल्या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झालाय. वारजे नदी पुलावरून धायरीकडे जात असताना यवतमाळ येथील संकल्प चव्हाण याला ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं संकल्पचा जागीच मृत्यू झाला.


शिर्डीला निघालेल्या दांम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू; 6 वर्षाची चिमुकली बचावली


नववर्षाच्या स्वागताकरीता शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनाकरीता मुंबईच्या भांडुप येथून बाईकवरून निघालेल्या दांम्पत्याचा मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. मात्र या अपघातात सहा वर्षाची चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. या घटनेनंतर कंटेनर चालक कपिल राजाराम देव याला ताब्यात घेण्यात आले आहे. या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.