Pandharpur Food Poisoning: पंढरपुरात 137 वारकऱ्यांना विषबाधा झाली आहे. हे वारकरी माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात आले होते. हे सर्व वारकरी भक्ती मार्गावरील संत निळोबा मठात थांबले होते. बुधवारी रात्री या सर्व 137 भाविकांना उपवासाचा फराळ म्हणून भगर आमटी देण्यात आली होती. त्यातूनच त्यांना विषबाधा झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवण झाल्यानंतर सर्व वारकरी रात्री झोपलेले असताना अचानक त्रास सुरु झाला. मध्यरात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व भाविकांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. सर्व वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. 


पंढरपुरात वारी काळात भेसळयुक्त पदार्थांची सरास विक्री होते. मात्र अन्न औषध प्रशासन विभाग मात्र कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने अशा घटना घडतात असा आरोप स्थानिक करत आहेत.