Ratan Tata Dies: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने भारतातील कोहिनूर हिरा हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. टाटा नावाच्या ब्रँडचा विस्तार त्यांनी जगभरात केला. अतिशय नीतीमत्त्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रँड वाढवला. शिवाय त्यांच्या दानशूर व्यक्तीमत्वामुळं ते भारतातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. रतन टाटा यांचा प्रवास मात्र साधा नव्हता. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष यांनाही कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागले. तेव्हा त्यांची आजी त्यांच्यी देखभाल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतन टाटा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा हे टाटा घराण्यात दत्तक आले होते. नवल यांचे वजील होर्मुसजी टाटा हे रतन टाटा यांचे आजोबा होते. ते टाटा कुटुंबीयांचे नातेवाईकही होते. 1948 साली जेव्हा रतन टाटा हे 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील नवल आणि आई सोनू यांचा घटस्फोट झाला. तेव्हा रतन टाटा यांना त्यांची आजी नवाजीबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. रतन टाटा आणि त्यांचे बंधू या दोघांचंही त्यांनी पालनपोषण केले. पण त्यांच्या आजीने त्यांना दिलेली एक शिकवण त्यांनी कायम लक्षात ठेवली. 


एका मुलाखतीत बोलताना टाटा यांनी आजीच्या आठवणीतील काही किस्से सांगितले होते. टाटा म्हणाले होते की, तसं पाहायलं गेलं तर माझं बालपण मजेत गेले होतं. मात्र जसं जसं मी आणि माझा भाऊ मोठे होत गेलो तेव्हा आम्हाला रॅगिंग आणि काही संकटांचा सामना करावा लागला. आमच्या पालकांच्या घटस्फोट यासाठी कारणीभूत होता. मात्र आमच्या आजीने आमचं संगोपन उत्तमरीत्या केलं होतं. जेव्हा माझ्या आईचं दुसरं लग्न झालं तेव्हा शाळेतील काही मुलं आमच्याबद्दल उलटसुलट चर्चा करत होते. मात्र, आमच्या आजीने आम्हाला नेहमीच मर्यादेचे उल्लंघन करु नका, अशी शिकवण दिली. ही शिकवण आजपर्यंत आमच्यासोबत आहे. 



टाटा यांनी पुढे म्हटलं होतं की, आजीच्या याच शिकवणीमुळं आम्ही बऱ्याचदा अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष केले त्यामुळं पुढील वाद-विवादही टळले. मला आजही आठवतंय की, दुसऱ्या महायुद्धानंतर आजी मला आणि माझ्या भावाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लंडनला घेऊन गेली. तिथे मला जीवनमुल्य शिकण्यास मिळाली. ती आम्हाला नेहमी सांगायची की, असं बोलू नये. त्यामुळं लहानपणापासूनच आमच्यावर मर्यादेचे उल्लंघन करु नये, असे संस्कार झाले आहे. आजी कायम आमच्यासोबत असायची. 


टाटा यांनी म्हटलं होतं की, मला व्हॉयलिन शिकायचं होतं पण वडिलांनी पियानो शिकण्यास सांगितलं. मला अमेरिकेतील कॉलेजमध्ये जायचं होतं पण मी युकेला जावं असा वडिलांचा आग्रह होता. मला आर्किटेक्ट व्हायचं होतं तर त्यांना मला इंजिनियर करायचं होतं. पण माझी आजी नसती तर मी कधीच अमेरिकेतील विद्यापीठात जाऊ शकलो नसतो. त्यांच्यामुळेच मी मॅकेनिकल इंजिनिअरिंगसाठी दाखल झालो मात्र आर्किटेक्‍चरची डिग्री घेऊन बाहेर आलो. माझे वडिल खूप नाराज होते त्यावरुन खूप वाददेखील झाले. मात्र अखेर मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. हेच माझ्या आजीने शिकवलं की, हिम्मतदेखील सौम्य व आदरयुक्त असू शकते.