अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती:  गेल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून व्हायला लागले आहेत. अमरावती विभागातील सर्वात मोठं व अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण सध्या १०० टक्के भरले आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मोठ्या प्रमाणात पावसाचा धरणात पाण्याचा येवा सुरू असल्याने  या धरणाचे १३ दरवाजे तब्बल २ सेंटीमीटरने उघडण्यात आले. यामधून ३७०८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या धरणाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.

त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाचे सर्व अधिकारी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे तर कौडण्यापुर येथील पूल रहदारीसाठी प्रशासनाने बंद केला आहे. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर धरणाचे उंच दरवाजे उघडण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे तर आजही दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता असून सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे.


मुंबईतील पाणीकपात आजपासून मागे
राज्याच्या इतर भागांप्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांतही चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली पाणीकपात शनिवारपासून मागे घेण्यात येणार आहे. आजपासून बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्राला नियमित पाणीपुरवठा केला जाईल. जुलै अखेरीस तलावांमधील एकूण जलसाठा हा केवळ ३४ टक्‍के उपलब्‍ध असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक‍ ५ ऑगस्‍ट २०२० पासून २० टक्‍के पाणीकपात लागू केली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात झालेल्‍या दमदार पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन दिनांक २१ ऑगस्‍ट २०२० पासून पाणीकपात २० टक्‍क्‍यांवरुन १० टक्‍के करण्‍यात आली होती. त्‍यानंतर तलाव क्षेत्रात सातत्‍याने पावसाने हजेरी लावल्‍याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. शुक्रवारी सकाळी करण्‍यात आलेल्‍या मोजणीनुसार सातही तलावातील एकूण जलसाठा हा ९५.१९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.