मुंबई : Holi Festival : होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या 100 विशेष गाड्या (ST transport service) सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली. दरम्यान, होळीसाठी जाणाऱ्यांकडून खासगी गाड्यांनी जास्तीचे पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. त्याचवेळी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून आजपासूनच ते 27  मार्च 2022 दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेसनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारु नये, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांवर परिवहन आयुक्त यांनी दोषींवर कारवाई करावी, असे आदेश दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले.



होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी  अद्याप सुरू असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधिक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची परिवहनमंत्री यांनी तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक अधीक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री यांनी दिले.


होळी सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली आहे.  या गाड्या  मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.