जयेश जगडसह विशाल करोळे, झी मीडिया, अकोला : परतीच्या पावसाने राज्यातल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावले आहे. खरीपाची जवळपास सगळीच पिकं पाण्यात गेलीयत. राज्यातल्या सत्ता स्थापनेचा गुंता कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात पिकांच्या नुकसानीची पाहाणी केली. तर उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पिक नुकसानीची पाहणी केली. दुसरीकडे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी भाजपा तर सत्तेत मोठा वाटा मिळविण्यासाठी शिवसेना जोर लावताना दिसत आहे. या सर्वात सत्ता स्थापनेचा तिढा लवकर सुटला नाही तर शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सगळ्याच नेत्यांनी सांगितलंय. नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत. तसंच मदतही तातडीनं देण्याची ग्वाही नेत्यांनी दिली आहे.



राज्यात काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अनेक मर्यादा आहेत. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. तर पावसाच्या निमित्ताने देवेद्र फडणवीसांना टोला लगावण्याची संधी उद्धव ठाकरेंनी सोडली नाही.


शेतकऱ्यांच्या हातातून जवळपास खरीपाचा हंगाम निघून गेलाय. शेतकऱ्यांना तातडीनं मदत हवीय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी का होईना राज्यातला सत्तास्थापनेचा पेच लवकरात लवकर सुटावा असे वाटू लागले आहे.