औरंगाबाद : रविवारी झालेल्या गारपिटीचा फटका  मराठवाड्यातील ३४१ गावांना बसला असून ४१ हजार ५३१  हेक्टरवर नुकसान झालं असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलीये. 


किती झालं नुकसान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद आणि लातूर वगळता उर्वरित जिल्ह्यांची हा प्राथमिक नुकसान अहवाल विभागीय आयुक्तांना प्राप्त झाला आहे. १७, ९९८ हेक्टर जिरायत तर  २०, ४०२ हेक्टर बागायत तसेच ३,२१९ हेक्टर फळबागांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका जालना जिल्ह्याला बसला आहे. या गारपीटीत १८ मोठी जनावरांचा मृत्यू झालाय.


जालन्यात मोठं नुकसान


जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात देखील जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे मंठा शहरासह तालुक्याला काश्मीरच रूप आलं होतं. मंठा तालुक्यात सकाळी ६ वाजेच्या सुमारास गारपिटीचा फटका बसला. यामुळे तालुक्यातील हरभरा, गहू या पिकांबरोबरच अन्य पिके जमिनीवर अक्षरशः आडवी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंठा तालुक्यातील जवळपास सर्वच गावात गारपिटीने थैमान घातलं. त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. 


गारांचा खच पडल्याने पिकं उध्वस्त


काढणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. गारपिटीमुळे रस्त्यासह प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकात गारांचा खच पडल्याने पिकं उध्वस्त झालीत.