मुंबई : तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


तर सातारा, सांगली जिल्ह्यात उद्या हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात हवामानातल्या बदलामुळे काल राज्यभर ढगाळ वातावरण होते.


त्याचाच परिणाम म्हणून आज उद्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाची शक्यता आहे.


 गेले काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने मुंबईसह कोकणपट्टय़ातील भागांतही ढगाळ वातावरण आहे. मळभ दाटल्यामुळे कडक उन्हापासून बचाव होतोय.



अवकाळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत


निकषात नसणा-या अवकाळीबाधित शेतक-यांनाही मदत मिळणार आहे. निकषात न बसणा-या शेतक-यांना विशेष बाब म्हणून सुमारे 1400 कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय होणारा आहे.


 तसेच पुढील खरीप हंगामापासून मदतीच्या निकषामध्ये बदल केला जाणार आहे...तीन दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस होऊन झालेल्या नुकसानीचीही शेतक-यांना भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.