Jitendra Awhad On Ajit Pawar : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची याचिका तातडीनं सुनावणीसाठी घेण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं होतं. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये पुढील तीन आठवडे तेच नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


आज सर्वोच्च न्यायालयाने भारतातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. ही आपणासाठी आश्वासक बाब आहे. अजित पवार यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात, शरद पवार यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये, अशी भूमिका मांडली. म्हणजेच शरद पवार नावाच्या सूर्याचा अस्त करावा, अशीच अजित पवार गटाची इच्छा त्यांच्या वकिलांनी वादविवादात पुढे आणली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने, "भारतात लोकशाही आहे अन् लोकशाहीत कोणत्याही माणसाला पक्ष आणि चिन्ह न देणं हे अयोग्यच आहे. तुमच्या लोकांनी पक्षात फूट पाडली. त्याचा १० व्या अनुसुचिशी सबंध आहे की नाही ? आपल्या देशाच्या सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानात काय झालंय?, असा सवाल करीत भारतातील महाराष्ट्रातील राजकारणाची पाकिस्तानातील राजकारणाशी तुलना केली. 


म्हणजेच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले... त्यातून शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळू न देता त्यांचा राजकीय अस्त करण्याचा अजित पवार यांचा कट उधळून लावला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केलीये.


अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असतानाच पक्षाबाबतचा निर्णय आलाच कसा? असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आगामी सात दिवसात शरद पवार यांना चिन्ह देण्याचे आदेश दिले. तसेच, जे नाव आहे तेच नाव प्रक्रिया सुरू असेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले. पण, यामध्ये एक बाब खटकली... शरद पवारांकडून पक्ष काढून घेतले, चिन्ह काढून घेतले.  सगळंच काढून घ्या.. आता कपडे काढून घ्यावे, इतके किळसवाणे राजकारण महाराष्ट्राचे करून ठेवले आहे. ज्यांनी दिले त्याच सगळेच काढून घ्यायचे हे कसलं राजकारण?, असं म्हणत आव्हाडांनी सडकून टीका केली आहे.