Jitendra Awhad On Contract recruitment : वैद्यकीय विभागामार्फत (Health Department) राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी (Contract Employees) भरले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 27 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचारी यांची बाह्य यंत्रणेद्वारे भरती केली जाणार आहे. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला राज्य सरकारकडून हे कंत्राट देण्यात आलंय. त्यावरून आता वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. सरकारी भरती ऐवजी कंत्राटी भरतीला प्राधान्य दिलं जात असल्याने आता विरोधाकांनी सरकारला धारेवर धरलंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित' सोडवलं आहे.


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये जातीय जनगणना झाली आणि 85 टक्के लोकसंख्या मागासवर्गीय असल्याचे सिद्ध झाले. यामध्ये SC, ST, OBC चा समावेश आहे. आम्ही महाराष्ट्रात देखिल जातीय जनगणनेची मागणी करीत आहोत. मला असं वाटतं याची आधीच कल्पना आल्यामुळे महाराष्ट्र सरकारने कंत्राटी स्वरूपात अधिकारी व कर्मचारी घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणतात.


याचा अर्थ स्पष्ट आहे की, जर जनगणना झाली आणि आरक्षण देण्याची वेळ आली तर या सरकारला कोणालाच आरक्षण द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे. आरक्षण तर नाहीच. नोकऱ्याही नाहीत. फक्त 9 कंपन्यांच्या मालकांचे खिसे भरणं एवढाच ह्या सरकारचा उद्देश दिसतोय, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.



आणखी वाचा - 5000 कंत्राटी कर्मचारी भरणार; सरकारने खाजगी कंपनीला दिले 110 कोटींचे कंत्राट


दरम्यान, लवकरच त्या 9 कंपन्यांच गौडबंगाल जाहीर करू, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी महायुती सरकारला दिला आहे. काय गंमत आहे, ज्यांनी जातीव्यवस्था जन्माला घातली, तिच्यातून स्वतःचा स्वार्थ साधून घेतला, तेच आता म्हणतायत की बिहारची जातीनिहाय जनगणना जातींमध्ये तेढ निर्माण करेल, असंही आव्हाडांनी पोस्ट करत म्हटलं आहे. बिहारने जातीगणनेची आकडेवारी जाहीर केली आणि अवघ्या देशासमोर जात उतरंडीच सत्य बाहेर आलं. बिहारच्या जातीनिहाय जनगणनेतून संपूर्ण भारताच्या एकूणच सामाजिक स्थितीच दर्शन होत आहे आणि हीच संपूर्ण परिस्थिती आपल्या देशाची असणार आहे यात मला तरी काही शंका वाटत नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं.