Kolhapur LokSabha Constituency : कोल्हापूर... दक्षिण काशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची पावन भूमी... स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणी आणि समाजातल्या दीनदुबळ्या, दलितांसाठी सामाजिक आरक्षणासारखे क्रांतीकारी निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही कर्मभूमी... एकाहून एक सरस पैलवान जन्माला घालणारी कुस्तीची पंढरी... मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर अशी कोल्हापूरची ओळख. कोल्हापूर म्हणजे साज ठुशी, कोल्हापूर म्हणजे चप्पला... आणि कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्सा... ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेले हे कोल्हापूर मात्र विकासाच्या क्रांतीतून लांबच राहिलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांना कोणत्या समस्या भेडसावतायेत पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या समस्या...


केंद्र सरकारचा कोणताही मोठा प्रकल्प जिल्ह्यात नाही. एमआयडीसी आहे, मात्र रोजगार देणारे मोठे उद्योग नाहीत. आयटी पार्क व्हावा, ही कोल्हापूरवासीयांची मागणी अजून सरकारच्या कानावर पडलेली नाही. मतदारसंघात म्हणावा तसा रस्ते विकास झालेला नाही. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचं आश्वासन अजूनही लालफितीच्या घाटात अडकलंय. 


कोल्हापूरचं राजकीय गणित


कोल्हापूर हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. सदाशिवराव मंडलिकांनी चारवेळा कोल्हापूरचं खासदारपद भूषवलं. एकदा काँग्रेस, तर दोनवेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर मंडलिक निवडून आले. 2009 मध्ये अपक्ष म्हणून सदाशिवराव मंडलिक निवडून आले. त्यांनी तेव्हा राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींचा 44 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांचे पुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांनी त्यांना 33 हजार मतांनी धूळ चारली.


2019 मध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिकांनी पराभवाचं उट्टं काढलं. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा त्यांनी तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्यानं पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर केवळ राधानगरी मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाशराव अबिटकर आमदार आहेत. चंदगड आणि कागलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.


आमचं ठरलंय... या परवलीच्या वाक्यामुळं 2019 ची निवडणूक गाजली. धनंजय महाडिक आघाडीचे उमेदवार असतानाही काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी 'आमचं ठरलंय' म्हणत उघडपणे विरोधात प्रचार केला. त्यावेळी मी बी ध्यानात ठेवलंय, असा गर्भित इशारा पवारांनी दिला होता.


आता खासदार संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटातून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. तर महाविकास आघाडीनं छत्रपती शाहू महाराजांचं नाव जवळपास निश्चित केलंय. वडिलांना उमेदवारी मिळणार असल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. तिसरीकडं मंडलिकांचा पत्ता कट करून, शाहू महाराजांच्या विरोधात समरजितसिंह घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली भाजपनं सुरू केल्यात. तसं झाल्यास राजघराणे विरुद्ध शाहू महाराज जनक घराणे अशी राजकीय लढाई कोल्हापुरात पाहायला मिळेल. त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके, तर काँग्रेसकडून प्रियंका गांधींचे निकटवर्तीय बाजीराव खाडे देखील इच्छुक असल्याचं समजतंय. त्यामुळे कोल्हापूरची लढत खऱ्या अर्थाने रंगतदार होणार हे निश्चित.


कोल्हापूरच्या माणसांचा आणि मातीचा गुणच न्यारा... राजकारणाच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होतं. संघर्षाचं, बंडखोरीचं, प्रस्थापितांच्या विरोधातलं आणि त्याचवेळी नवनव्या प्रवाहांना सामावून घेणारं इथलं राजकारण... अनेकदा तर महाराष्ट्राच्या राजकारणालाही टांग मारणारा आगळावेगळा कौल कोल्हापूरकरांनी दिलाय. मतदारसंघात कुणाला निवडून आणायचं, यापेक्षा कुणाला पाडायचं, याचीच चर्चा इथं जास्त रंगते. पाडापाडीचं राजकारण ही गेल्या काही वर्षांत कोल्हापूरची ओळख बनलीय. त्यामुळं कुणाला तरी पाडण्याऐवजी निवडून आणण्यासाठी कोल्हापूरकर मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.