LokSabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र मनसेने (MNS) संजय निरुपम (Sanjay Nirupal) यांच्यासह रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. लक्षात ठेवा राज ठाकरेंनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये संजय निरुपम यांना महाराष्ट्रद्रोही आणि रविंद्र वायकर यांना भ्रष्टाचारी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गट उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रविंद्र वायकर यांनी उमेदवारी देण्याची शक्यता असून ती जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. रवींद्र वायकर इच्छुक नसल्याने मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी सुरु असल्याचं समजत आहे. त्यातच संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा सुरु असून, त्यांनीही काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांची भेट घेतली होती. पण यावरुन महायुतीला पाठिंबा देणारी मनसे नाराज झाली आहे. 


शालिनी ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे.  इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये".



या पोस्टवर प्रतिक्रिया देताना शालिनी ठाकरे यांनी सांगितलं आहे की, "राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण काही जागांवरील जे उमेदवार समोर येत आहेत त्यांना मनसे कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यांचा प्रचार कसा करायचा अशी विचारणा ते करत आहेत.  तुमच्याकडे उमेदवार नाहीत आणि आमच्या पक्षालाही पुढे येऊ देत नाही. त्या अनुषंगाने मी कार्यकर्त्यांची भूमिका मांडली आहे". संजय निरुपम यांच्यासारखे नेते महाराष्ट्रात विनाकारण वाद निर्माण करतात अशी टीकाही त्यांनी केली. 


मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची होती ऑफर


राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात आपल्याला धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची ऑफर होती असा खुलासा केला होता. "एकनाथ शिंदे म्हणतात आपण एकत्र काही केलं पाहिजे. पण म्हणजे काय हे सांगत नव्हते. यासाठी मी अमित शहा यांना भेटलो. पण निशाणीवर प्रकरण आलं. माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. मी मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं होतं.