मुंबई : सगळेच्या सगळे अपक्ष भारतीय जनता पार्टीला मिळाले तरी सरकार स्थापन होत नाही असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सरकार हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येवुनच होवू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 'झी २४ तास' दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री कोणाचा होणार ? आणि जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार यावरून शिवसेना-भाजपामध्ये सध्या खलबत सुरु आहेत. दोन्हीकडचे नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता आमच्याकडे देवेंद्र आणि शिवसेनेकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय सोपवल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे जे ठरलंय तस बोलतोय..शिवसेनेत देखील अस ठराव अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 



महिना दीड महिने खूप दमछाक झाली आहे. त्यामुळे थोडं निवांत सुरू आहे. महाराष्ट्रत सगळं व्यवस्थित सुरू आहे. ठरल्याप्रमाणे शपथविधी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्हीदेखील प्रामाणिक आहोत.बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला देखील इनामदारी शिकवली असल्याचे पाटील म्हणाले. बाळासाहेब यांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक असून ते कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही असेही ते म्हणाले.


अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या तिघांमध्ये काय ठरलं हे माहिती नाही. अमित शाह यांनी काय वचन दिले हे मला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत चंद्रकांत पाटील हे नाव असल्याबद्दल त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री होण्याची कणभर इछा नसल्याचे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री हे अतिशय पारदर्शक माणूस आहेत. सर्वांना न्याय देतात तेच मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इछा असल्याचे ते म्हणाले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला मदत होईल असं वर्तन केलेलं नाही.


राज्यपाल खूप चांगली व्यक्ती असून ते कोणासोबत दुजाभाव करत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीही भेटू शकतो हे देखील त्यांनी राज्यपाल आणि सेना-भाजपा नेत्यांच्या भेटीबद्दल बोलताना स्पष्ट केले. ज्याला जे काम दिल ते तेव्हडच काम त्यांनी करायचं हे आमच्या संघटनेत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्तेचा फार्मूला काय ठरलं आहे हे मी विचारन चूक असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय सत्ता वाटपाबाबत कोणी बोलणार नाही. लवकरात लवकर सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.