लैलेश बारगजे, झी 24 तास, अहमदनगर :  राज्यातले शेतकरी संपावर (Maharashtra Farmers Strike) 1 जून पासून जाणार असल्याची शक्यता आहे. शेतकरी विविध मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करणार असल्याचं समजतंय. हे धरणं आंदोलन पुणतांबा इथे करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानं सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. (maharashtra farmers strike sugarcane subsidy milk frp and various demand farmers may strike on 1 june)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. पुणतांबा इथं शेतकरी 1 जून पासून धरणं आंदोलन सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात 23 मे रोजी पुणतांब्यात ग्रामसभा झाली. या ग्रामसभेचा ठराव सरकारला पाठवून 6 दिवस उलटले तरी सरकारने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेत. त्यांनी धरणं आंदोलनाचा निर्धार केलाय. 


काय आहेत शेतक-यांच्या मागण्या? 


ऊसाला एकरी 2 लाखांचं अनुदान द्यावं.  दुधाला एफआरपीप्रमाणे दर निश्चित करावेत. सोलर विजेची शेतकरी अनुदान प्रक्रिया सोपी करावी.  गव्हाच्या निर्यातीवरची बंदी हटवावी, अशा प्रमुख मागण्या  शेतकऱ्यांच्या आहेत.  


यासह 14 मागण्यांचे ठराव ग्रामसभेत घेण्यात आले. मात्र सरकारनं या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.


खरिपाचा हंगाम तोंडावर आलाय. अशात बळीराजा संपावर गेला तर ते राज्याला परवडण्यासारखं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय तोडगा काढतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.