मुंबई : प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक राज्यात दाखल होणार आहे. केंद्राचे हे पथक कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. केंद्राच्या या पथकामध्ये सात सदस्य असतील. यंदा झालेल्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने ६,८१३ कोटींच्या मदतीचा केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. आता केंद्र सरकारचं हे पथक पाहणीनंतर अहवाल देईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना केंद्राकडून किती मदत मिळते, ते समजणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सातारा, सांगलीमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला मुख्य कारण म्हणजे ऑगस्ट महिन्यचा १ तारखेपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस. या ऑगस्ट महिन्याच्या १० दिवसात तब्बल ३ हजार मिलीमीटर पाऊस एवढ्या प्रचंड पावसाची नोंद महाबळेश्वर भागात झाली.तर जुलै आणि ऑगस्ट या पंधरा दिवसात म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात ६ हजार मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरच्या भारतीय हवामान विभागात झाली आहे.  तसेच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली. तसेच अल्लमटी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली होती. 



कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरचा कहर दिसून आला. कोकणातही तीच परिस्थिती होती. आठवडाभर पाणी ओसरण्याचे नाव घेत नव्हते. राज्यात पुराचे आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात परिस्थिती अधिक वाईट होती. येथे चारही ठिकाणी केवळ पाणी दिसून येत होते. एनडीआरएफ, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराचे सैनिक लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ मदतीसाठी हातभार लावत होते.