Maharashtra Politics : बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यातील सत्तासंघर्षांनंतर, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी पक्षनाव व निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यासाठी शिंदे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता आयोगाने शिंदे गटाला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 40 आमदार आणि 13 खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता आणखी एक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झालीय. शिवसेना चिन्हावर निवडणून आलेल्या खासदारांची संख्या एकूण 18 होती. त्यातील गजाजन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाकडे 13 आणि ठाकरे गटाकडे 5 खासदार असे संख्याबळ होते. 


मात्र आता ठाकरे गटाकडून फक्त चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. तर ठाकरे गटाच्या पाचव्या खासदाराने  शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातील कागदपत्रांमधून हा खुलासा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण दुसरीकडे शिंदे गटात जाणारा खासदार नेमका कोण याची सगळीकडे उत्सुकता लागली आहे.


निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं - उद्धव ठाकरे


"गेले काही दिवस निवडणूक आयुक्तांनी हे जे काही थोतांड केलं ते एवढं भयानक आहे की, आमच्याकडे लेखी मागणी काय आहे?, तुम्ही आम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या सदस्यांचे अर्ज द्या. ते आम्ही लाखांमध्ये दिली आहेत. मग हा खटाटोप कशाला सांगितला तुम्ही आम्हाला. तुम्ही जे-जे मागितलं होतं ते-ते आम्ही दिलं. पण हेच जर शेण खायचं होतं तर आधीच खायचं होतं ना शेण.. आज निवडणूक आयुक्तांनी जे काही शेण खालेल्लं आहे ते शेणच खायचं होतं. कदाचित उद्या केंद्र सरकारचे गुलाम जे आयुक्त बसलेले आहेत हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील. त्याचीही आपण तयारी ठेवली पाहिजे. मशालीची धग काय असते ही यांना दाखवावी लागेल," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दिली आहे.