अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (ShivSena) निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या सभेवरुन नवनीत राणा यांनी टीका केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवैसीला अटक करण्याची ठाकरेंमध्ये हिम्मत नाही ते संभाजीनगर नामकरण कधी करणार ? ठाकरेंना औरंगजेबाचा पुळका का ? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या सभेतून जनतेला काय मिळालं तर भोपळा, आज वाटलं होतं ठाकरे संभाजीनगरचा पाणी प्रश्न मिटवतील पण त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. नंतर वाटलं औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करतील पण त्यावरही निर्णय घेतला नाही. सरदारच लबाड असल्यामुळे शिवसेना 'लबाड सेना' बनलीय…'लबाड लांडगा ढोंग करतोय निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय…' अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. 


शून्य निर्णयक्षमता असलेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल. उद्धव ठाकरेंना औरंगजेबचा एवढा पुळका का आहे… अन् औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्या औवेसीवर ठाकरे सरकार मेहरबान का आहे? असा सवाल नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 


संभाजीनगर नामकरण करण्याची इच्छा ठाकरेंची नाहीच शिवाय औवेसींना अटक करण्याची हिम्मतही उद्धव ठाकरेंमध्ये नाही. महागाई वरून गरळ ओकणाऱ्या ठाकरे सरकारनं जनतेची चेष्टा केलीय. डिझेल आणि पेट्रोलवरचा कर कमी करण्यास सरकार तयार नाही. हनुमान चालिसा पठन केल्यामुळे आमच्यावर राजद्रोहा सारखा गुन्हा दाखल केला. हा कलंक दूर करण्यासाठी दुग्धाभिषेक आम्ही केलाय. 


तुमचा पापाचा घडा भरत आलाय, तुम्ही केलेलं पाप गंगेत न्हाहूनही धुतलं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची चेष्टा चालवलीय. बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याचं आश्वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे घराबाहेर न पडण्याचा वर्ल्ड रेकॅार्ड तेवढा केलाय अशी बोचरी टीकाही नवनीत राणा यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला तरी उद्धव ठाकरेंच्या संवेदना जागा झाल्या नसल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय.