Maharashtra Rain Update: सप्टेंबरमध्ये पावसाने चांगला जोर धरल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र, काही दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पुन्हा एकदा मान्सूनने (Monsoon) ब्रेक घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात चांगला पाऊस झाला होता. काही जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा बळीराजाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पाऊस पुन्हा एकदा विश्रांती घेणार आहे. (Monsoon Update In Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट दिला होता. त्याशिवाय मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, रविवारपर्यंत मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात पाऊस बरसला होता. मात्र, आज 11 सप्टेंबरपासून पावसाने पुन्हा एकदा ब्रेक घेतला आहे. पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने बळीराजा सुखावला होता. शेतीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र, आता पुन्ही पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजाच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. शेतीची कामे पुन्हा खोळंबणार आहेत. 


आज महाराष्ट्रातील कोणत्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाहीये. आज संपूर्ण महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा उकाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावेळी काही जिल्यात उष्णतेत वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे. आजपासून तीन दिवस अशीच परिस्थीती राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 


तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर 13 तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यावेळी पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 14 तारखेला राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. 



दरम्यान, सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अद्यापही दुष्काळसदृश्य स्थिती आहे. मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात पावसाने दडी मारलीय, त्यामुळे शेतकरीराजा संकटात सापडला आहे.