ST News in Marathi: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशावेळी लाखो चाकरमान्यांनी पावलं गावाकडे वळतात. गावाला जाण्यासाठी मिळेत ते वाहन पकडून घर गाठण्याची त्यांची लगबग असते. अशातच ऐन गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटीची चाके थांबण्याची शक्यता आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कामगारांच्या समितीने काही मागण्या केल्या आहेत. एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांएवढे करावे, ही कामगारांची प्रमुख मागणी आहे. ७ ऑगस्टला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत २० ऑगस्टला बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्य सरकारने आश्वासन न पाळल्यामुळं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.  


राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. राज्यभरात बैठकांचे सत्र राबवून 3 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. 


उद्यापासून एसटी कामगार काम बंद ठेवून धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी बंद झाली तर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. कारण गावा-गावात एसटी हा एकमेव वाहतुकीचे साधन आहे. खेड्या-पाड्यात एसटी पोहोचत असल्याने प्रवाशांसाठी एसटी खूप महत्त्वाची आहे. अशातच जर ऐनगणेशोत्सवात एसटी बंद असेल तर प्रवाशांचे खूप हाल होणार आहेत. 


दरम्यान,  गणेशभक्तांची गैरसोय झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहिल असा इशारा कृती समितीच्या संदिप शिंदे यांनी दिला आहे.