Kolhapur Rain Alert:  कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं पुराचे पाणी आता रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूरात नदीचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच, सांगलीलाही पुराचा धोका वाढत चालला आहे. सांगली जिल्ह्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळं धरणे तुडुंब भरली आहेत. 


कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी वाढली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून या नदीच्या पण्यामुळे अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. पंचगगा नदी धोका पातळी वरून वाहत असून नदीची पाणी पातळी 44 फूट 4 इंच इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. राधानगरी धरणाचे एकूण 6 स्वयंचलीत दरवाजे उघडले असून त्यातून 10 हजार 68 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. 


आज पहाटे 5 वाजता धरणाचा स्वयंचलित क्रमांक 1 चा दरवाजा उघडला. त्यामूळे नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यास आहेत. जिल्ह्यांतील इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. यातील अनेक नद्यांचे पाणी रस्त्यावर आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील बाजारपेठेत ताम्रपणे नदीचे पाणी घुसले आहे. बाजारपेठेत सध्या दोन फूट पाणी आहे. इचलकरंजी शहरामधील सखल भागात पंचगंगा नदीचे पाणी घुसू शकते त्यामुळे सकल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.


एकूण 11 राज्यमार्ग मार्गावर पाणी आले आहे. प्रमुख जिल्हा मार्गावर 29 ठिकाणी पाणी आहे. तर 13 जिल्हा आणि 25 ग्रामीण मार्ग बंद आहेत. दरडप्रवण/भूस्खल गावांमधुन एकूण 16 व्यक्तीचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूरग्रस्त महानगरपालिका हद्दीतील एकुण 54 जणांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावातील 587 जणांचे स्थलांतर करण्यात आले. हातकणंगले व शिरोली गावातील एकुण 13 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. इचलकरंजी मधील रुई, इंगळी येथील एकुण 53 जणांचे स्थलांतर करण्यात आले. 


कृष्णेची वाटचाल इशारा पातळीकडे


कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाची संततधार कायम आहे.त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. 6 वाजेपर्यंत कृष्णेची पातळी 36 फुटांवर पोहचली आहे.40 इशारा तर 45 फूट ही धोक्याची पातळी आहे,तर पाण्याची पातळी वाढत असून शेरीनाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचे पाणी शहरातील सखल भागात शिरू लागले आहे,कर्नाळ रोडवरील पुल आता पाण्याखाली गेला आहे,त्यामुळे नांद्रे-पलूसकडे जाणारी वाहतूक अन्यमार्गाने वळवण्यात आली आहे.तसेच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केले आहे.


धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी 


सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात 168 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.यामुळे चांदोली धरण 88.73 टक्के भरले आहे.34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 30.53 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणातुन विसर्ग वाढवून 10 हजार 117 क्युसेक पाणी वारणा नदीत विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली असून वारणा नदीला पूर आला असून शेकडो एकर शेती पाणी खाली गेली आहे,तर 11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेले आहेत. तर वारणा नदीची पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावे,अश्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.