Maharashtra Weather news : दर दिवसागणिक महाराष्ट्रात तापमानाचा आकडा वाढत असून, त्यामुळं उष्णतेचा दाहसुद्धा सोसेनासा झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगाव इथपर्यंत करण्यात आली असून, इथं 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. एकिकडे उकाडा वाढत असतानाच दुसरीकडे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मितीसुद्धा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं असलं तरीही उकाड्याचच वर्चस्व राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानं महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये एप्रिल ते जून अशा कालावधीसाठी प्रचंड उष्णतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार एप्रिल हा सर्वात उष्ण महिना ठरणार असून, राज्यात पुढचे 20 दिवस हे उकाड्याचे आणि परिणामी उष्माघाताच्या धोक्याचे असू शकतात. ज्यामुळं दुपारच्या वेळी गरज नसेल तर, घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : हेल्थ ड्रिंकच्या नावे विकले जातायत एनर्जी ड्रिंक? आता नाही चालणार मनमानी; FSSAI चे महत्त्वाचे निर्देश


 


पुढील 24 तासांसाठी राज्यातील विदर्भ, मराठवाडा येथे हवामान कोरडं राहील आणि रात्रीच्या वेळीसुद्धा तापमानाचा आकडा कमी होण्याची चिन्हं नसतील. तर, धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरमध्ये उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात मात्र उष्णतेपासून किमान दिलासा मिळू शकतो. येत्या 24 तासांमध्ये विदर्भात तापमानाच 2 अंशांची वाढ अपेक्षित असून, सूर्याच्या प्रकोपामुळं उष्णतेचा दाह अधिक जाणवणार आहे. तर, देश स्तरावर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशात तापमानाचा आकडा नागरिकांना हैराण करणार आहे. 


कोणत्या भागांवर पावसाचं सावट ? 


सध्या देशाच्या तामिळनाडू, कर्नाटकासर मराठवाडा आणि विदर्भावर एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं राज्यात दिवसासोबतच रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याल उष्णतेचा दाह आणखी अडचणी वाढवताना दिसू शकतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.