Maharashtra Weather News : राज्यावर असणारे पावसाचे ढग आता काही अंशी विरताना दिसत असून, येत्या काही दिवसांमध्ये पाऊस राज्यातून काढता पाय घेण्यास सुरुवात करेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात पावसाच्या अनधुमधून बरसणाऱ्या सरी सुरुच असल्या तरीही मुंबई, उपनगर क्षेत्रांमध्ये मात्र पाऊस बहुतांशी उघडीप देताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर मधूनच या पावसाची येणारी जोरदार सर अनेकांनाच गोंधळात टाकताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य भारतात सक्रिय असणारं कमी दाबाचं क्षेत्र सध्या विरळ होऊ लागलं असून, पावसाचा जोर कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या पुणे आणि साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसणार आहे. 


राजस्थानपासून बंगाच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून गुजरातपासून केरळच्या उत्तरेपर्यंत समांतर क्षेत्रामध्ये समांतर प्रणालीत कमी दाबाचा हा पट्टा सक्रिय असल्यामुळं तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग, केरळ आणि तामिळनाडूचं किनारपट्टी क्षेत्र या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल


 




पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा इशारा


पुढील दोन दिवस राज्यातील दक्षिण कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो. पठारी भागात मध्यम सरींचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 
मराठवाडय़ातही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.