Maratha Reservation :  मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्य सरकारने सगेसोयऱ्यांचा जो अध्यादेश (GR) काढला, त्याची तातडीने अंमलबजावणी करा, कारण कुणबी नोंद (Kunbi Certificate) सापडलेल्या अद्याप प्रमाणपत्राचं वाटप सुरु करण्यात आलेलं नाही. येत्या पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 31 जानेवारीपासून अंमलबाजवणी सुरु केली नाही तर 10 फेब्रुवारीपासून आंतरवली सर्राटीत आपण आमरण उपोषण (Hunger Strike) करणार असल्याचं घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगेसोयरांचा कायदा यासाठी महत्त्वाचा आहे कारण मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत. या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही तर किंवा एका कोणाच्या दडपणाखाली येऊन कायदा टिकवण्याची जबाबदारी पार पाडली नाही तर पुन्हा अडचणी वाढतील. समितीला मुदतवाढ दिल्यानंतरही समिती काम करत नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. 


ज्या केसेस मागे घ्यायच्या आहेत त्या चार दिवस उलटूनही मागे घेतलेल्या नाहीत. या सर्व केसेस दाह फेब्रुवारीच्या आत मागे घेण्यात याव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे. हैदराबादचं गॅजेट समितीने अद्याप स्विकारलेलं नाही. ते तातडीने स्विकारुन त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्यायला हवा असं जरांगे यांनी म्हटलंय.


राज्य सरकारमध्येच दोन भूमिका दिसतायत. एकिकडे सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडे सांगायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ या साठी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. कारण राज्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे, सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. ज्यांच्या ज्यांच्या नोदी सापडल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील नातलगांचे अर्ज दाखल करा, अर्ज दाखल केल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आाहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय एक पाऊलही मागे सरकणार नाही अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंदोलन थांबलेलं नाही आणि थांबवणारही नाही. मुंबईकडे नेलेला लढा हा सर्वसामान्या गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी होता, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. 9 फेब्रुवारीला राज्य सरकारने दिलेल्या मुदतीचे पंधरा दिवस पूर्ण होतायत, अंमलबजावणी न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.