Jalgaon Crime News:  कोलकाता आणि बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. महिला अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. जळगावातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणरायाच्या स्थापनेच्या दिवशीच चोपडा तालुक्यातील एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नराधमाने सुरुवातीला तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनीही पाशवी अत्याचार व खून करुन पळून जाणाऱ्या नराधमाला ताब्यात घेतलं आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही शेतात कामासाठी गेली होती. संध्याकाळी शेतातून काम करुन घरी येत असताना नराधमाने बळजबरीने तिला ओढून शेतात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर कोणालाही कळू नये यासाठी तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडीत मुलीच्या लहान बहिणीसमोर हा सगळा प्रकार घडला होता. त्यानंतर लहान बहिणीने गावात जाऊन सगळ्यांना घडलेली हकिकत सांगितली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 


अंबरनाथमध्ये ६ वर्षीय मुलीचा विनयभंग 


अंबरनाथमध्ये एका ६ वर्षीय चिमुकलीचा २३ वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे. अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित ६ वर्षीय मुलगी आणि २३ वर्षीय आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी रस्त्यावरून एकटी जात असल्याचं पाहून या नराधमाने तिला आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेली मुलगी रडू लागल्याने परिसरातील लोकांचं त्याकडे लक्ष गेलं. यानंतर लोकांनी या नराधमाला पकडून त्याला बेदम चोप दिला.