मुंबई : पक्ष सोडतानाही नारायण राणेंनी कॉंग्रेसवर टीका केली. राणेंच्या पक्षत्यागानंतर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरूवात केली आहे.पक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची, असा सवाल कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणेंनी कॉंग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीबद्धल प्रसारमाध्यमांसमोर बोलतान हुसेन दलवाई म्हणाले, राजकारणात सहनशीलता, सामंजस्य, धीरगंभीरपणा आणि सबुरी आवश्यक असते. अनकेदा निर्णय मनासारखे होत नाहीत. पण, प्रत्येक वेळी पक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कसं व्हायचं, असं मत व्यक्त करतानाच राणेंना पक्षाने भरभरून दिले. पक्ष सोडल्यावर ते टीका करणं सहाजिकच असल्याचे दलवाईंनी म्हटले आहे.


राणेंनी पक्ष सोडू नये यासाठी मी व्यक्तीश: राणेंना अनेकदा बोललो. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशी पुस्ती जोडतानाच राणेंनी भाजपमध्ये जाऊ नये, असा सल्लाही दलवाईंनी दिला. भाजपमध्ये केवळ संघातून आलेल्यांनाच महत्त्व दिले जात असल्याचेही दलवाई म्हणाले. दरम्यान, राणेंचा आक्रमक स्वभाव आणि पक्षनेतृत्वावरच टीका करण्याची सवय यामुळेच राणेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याच्या चर्चेला हुसेन यांच्या प्रतिक्रीयेमुळे बळ मिळाले आहे.