मुंबई : महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या पोलीस भरतीला खासदार संभाजी राजे यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना नोकर भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखे असल्याचं मत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे सरकारच्या या निर्णय़ामुळं मराठा समाज पेटून उठला असून, पोलीस भरतीचा निर्णय चुकीच्याच वेळी घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 'मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?', असा थेट सवाल त्यांनी केला. शिवाय राज्य शासनानं भरतीचा घेतलेला हा निर्णय म्हणजे एक प्रकारे सरकारकडून मराठा समाजाला दिलेली चिथावणी असा तीव्र नाराजीचा सूर त्यांनी आळवला. 


मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये अशी मागणी करत हे आरक्षण टीकवण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत यासाठी संभाजी राजे आग्रही दिसले. 


एकिकडे सरकार आरक्षणासाठी बैठका घेत असताना दुसरीकडे मात्र मोठ्या संख्येनं नोकर भरतीही काढली जात आहे ही परिस्थिती मांडत एकंदर राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पाहता थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे असा खडा सवाल त्यांनी केला. इतकंच नव्हे, तर कोरोना काळात भरती प्रक्रिया नेमकी का आणि कशी राबवली जाते हा मुद्दाही उपस्थित करत; मास्क घालून भरती करणार तरी कशी असा प्रश्नार्थक सूर त्यांनी आळवला. 


 


दरम्यान, बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी समोर आली. ज्याबाबत संभाजी राजेंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.