Mumbai Infra Metro Projects मुंबई व उपनगरात मेट्रोचे जाळे वेगाने पसरत आहे. आता मुंबईबाहेरील परिसरातही मेट्रोचा (Mumbai Metro) विस्तार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जेएनपीटी-नायगाव मेट्रो (JNPT - Naigaon Metro) प्रकल्पाचा विस्तार आता थेट विरारपर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी नुकतीच या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने याप्रकरणी सरकारकडे मागणी केली होती. या मागणीला अखेर सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासनाकडून प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा कॉरिडॉर जेएनपीटी ते नायगावपर्यंत होता. आता त्याचा विस्तार होणार आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मेट्रोने नवी मुंबई आणि उरणपर्यंत मेट्रोने जाता येणार आहे. प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरसह मेट्रो आणि रस्ता एकाच वेळी बांधण्याच्या मागणीलाही मंजुरी मिळाली आहे. 


सध्या जेएनपीटी बंदराचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी मेट्रो प्रकल्प आहे. त्यामुळं या बंदरापासून मेट्रो मार्गिका विरारपर्यंत आणण्याची मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांच्या या मागणीला अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरसह मेट्रो आणि रस्ता एकाचवेळी बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास सर्वात लांब मेट्रो मार्गांपैकी एक असणार आहे. तसंच, मुंबई महानगर प्रदेशात शेवटच्या घटकापर्यंत जोडणीसाठी हा मार्ग फायदेशीर ठरणार आहेत.


पालघर जिल्ह्यातील नागरिकांना नवी मुंबई, उरण याठिकाणी जायचे असल्यास जवळपास तीन गाड्या बदलाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून सरकारने मल्टी कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता. यात रस्ता आणि मेट्रोचा समावेश आहे. त्यामुळं आता वसई, विरारमधील नागरिकांना प्रवासाचे आणखी एक साधन उपलब्ध होणार आहे. 


दरम्यान, वसई मेट्रो प्रकल्प हा 2026मध्ये पूर्ण केला जाणार होता. मात्र एमएमआरडीएच्या अहवालानुसार मेट्रोला विलंब लागण्याचे समोर आले होते. त्यामुळं वसई तालुक्यात लवकरात लवकर मेट्रो आणण्याचे प्रयत्न सुरू होते. जेएनपीटी बंदराचे काम जिथे सुरु आहे तिथेच मेट्रो प्रकल्पदेखील आहे. त्यामुळं या बंदरापासून मेट्रो मार्गिका विरारपर्यंत आणण्याचा पर्याय बहुजन विकास आघाडीकडून उपस्थित करण्यात आला होता.