मुंबई : बाळासाहेब ठाकरे माझे गुरु आहेत त्यांच्या तालमीत मी तयार झालोय मात्र उद्धव ठाकरे हे अनुभव शून्य आहेत, ते मुख्यमंत्री झाल्याने राज्य अधोगतीला जाईल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. पुण्यातल्या सॅटर्डे क्लबमध्ये संवाद साधताना ते उपस्थितांशी संवाद साधत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाईट लाईफ ही कोणाची मागणी नव्हती हा फक्त चिरंजीवांचा हट्ट असल्याची टीकाही राणेंनी केली. असे हट्ट पुरवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी इतर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही राणेंनी लगावला आहे.  


यावेळी, नारायण राणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कधीही वाटलं नसल्याचं म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर पाहिलं. ते अभ्यासू होते. आता उद्धव ठाकरेंनीही राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान ठेवावा असं म्हटलंय.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुंबईतील भाजप कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील सत्तांतराविषयी सांगत असताना त्यांनी सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीचं अस्तित्वंच कुठे जाणवत नसल्याचं म्हणत राणेंनी तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचा कारभार ठप्प झाल्याचंही ते यावेळी म्हणाले होते.