सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik Crime) शहरात सशस्त्र तरुणांनी भररस्त्यात दोन जणांना भोसकून त्यांचा दिवसाढवळ्या खून केला आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. टोळक्याच्या हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी (Nashik Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडेराव मंदिर, शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात धारदार शस्राने छातीवर गंभीर वार झाल्याने मेराज खान (वय 18) आणि इब्राईम खान (वय 23) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोघेही संजीवनगर येथील राहणारे असून एकाचा मासे विक्रीचा व्यवसाय तर दुसऱ्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. 


नेमकं काय घडलं?


नाशिक शहरातील चुंचाळे शिवारातील संजीवनगर शिवारात टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोन युवकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान अंबडच्या संजीवनगर भागात ही घटना घडली. दोन अल्पवयीन युवक एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्याचवेळी त्यांची भाषा न समजल्याने ही शिवीगाळ आपल्याला केली या समजातून मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख या दोघांसोबत अल्पवयीन तरुणांचा वाद झाला. त्यानंतर अल्पवयीन युवकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. रागाच्या भरात टोळक्याने मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख यांच्यावर चाकू आणि दांडक्याने हल्ला केला.


या हल्ल्यात मेराज असगर अली खान याचा जागीच मृत्यू झाला. तर इब्राहिम हसन शेख हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तसेच एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील दोन विधीसंघर्षित आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.


दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी संजीवनगर भागात झालेल्या डबल मर्डर प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणासमोर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार न झाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी थेट मृतदेह पोलीस आयुक्तालयात नेला होता. या ठिकाणी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण जिल्हा रुग्णालय आणि घटनेचा परिसर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.