Ajit Pawar Black and White: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारने (Mahavikas Aghadi) आपल्या अटकेचा कट आखला होता असं विधान करत खळबळ उडवून दिली होती. ठाकरे सरकारने पोलीस आयुक्तांना आपल्या अटकेचे आदेश (Devendra Fadnavis Arrest) दिले होते असा दावा फडणवीसांनी केला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ सुरु झाला होता. दरम्यान फडणवीसांच्या या दाव्यावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.  'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याची राजकीय स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सूडबुद्धी इतक्या वेगाने का वाढत आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "कुठल्याही राज्यात, पक्षात वरिष्ठ कोणत्या पद्दतीने वागतात याला महत्त्व आहे. वसंतदादा नाईक, विलासराव देशमुख असा अनेकांचा काळ पाहिला तर फक्त विरोधाला विरोध अशी भूमिका न ठेवता, जिथे विरोध तिथे विरोध आणि जिथे मैत्री तिथे मैत्रीचे संबंध असं असायचं".  


पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले "दुर्दैवाने आम्हाला..."


 


"आमच्या सरकारमध्ये गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला जात असून त्यात किती तथ्य आहे हे मला माहिती नाही. मी पण अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. मी ज्या चर्चेत, बैठकांमध्ये सहभागी झालो तिथे अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाल्याचं मला तरी आठवत नाही", असं सांगत अजित पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला. 


"माझ्या पाठीला डोळे नाहीत"


"मी ज्या मंत्रीमंडळ बैठकांमध्ये असायचो, समितीत असायचो तिथे अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. मी सरकारमध्ये असताना सकाळपासून उशिरापर्यंत काम करायचो. पण अशी कोणताही चर्चा माझ्या स्तरावर झाल्याचं मला तरी जाणवलं नाही. कारण जर तशी माझ्यासमोर झाली असती तर हे योग्य नाही असं सांगितलं असतं. पण माझ्या पाठीमागे काही झालं असेल तर माहिती नाही," असं सूचक विधान अजित पवारांनी केलं. 


"मी स्वत:ला दादा...."; CM एकनाथ शिदेंच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी दिलं उत्तर


 


"एकदा जनतेने कौल दिल्यानंतर ज्यांच्या हाती सूत्रं दिली आहेत त्यांना काम करु द्यावं या मताचा मी आहे. ते काम करत असताना त्यांनी विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करु नये. जर कोणी कायदा, संविधानाचं उल्लंघन केलं असेल, तुमच्याकडे पुरावे असतील तर गोष्ट वेगळी आहे. पण अलीकडे विरोधी पक्षाचे असल्यास वेगवेगळ्या नोटीस पाठवायच्या आणि सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर ते थांबवणार अशा घटना अलीकडे घडल्या आहेत. हे जे काही प्रकार आहेत ते महाराष्ट्रात कधी पाहिले नव्हते. यामागील करता करविता कोण आहे हे जनतेने ओळखलं पाहिजे," अशी टीका अजित पवारांनी केली आहे. 


उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप?


उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नसताना त्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीवर काही आक्षेप जाणवला का? असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले "माझी आणि त्यांची जास्त ओळख नव्हती. आम्ही एकमेकांना फार भेटलेलो नव्हतो. आम्ही आपापल्य पक्षांचं काम करत होतो. त्यांच्यासह काम करताना मला तरी त्यांची समंजस्याची भूमिका दिसली. आम्हाला कधीही कुठेही अडचण आलेली नाही. माझे काही विषय असून त्यासाठी मी आग्रही असेन असं त्यांनी सांगितलेलं होतं. ज्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाजच्या नामांतराचा विषय होता". 


एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण काय?


"तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय जेव्हा झाला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या आघाडीचं प्रमुख व्हावं असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी केला. उद्धव ठाकरे प्रमुख असल्याने त्यांना कोणाला विचारण्याची गरज नव्हती. तो आग्रह झाला नसता तर उद्धव ठाकरेंनी कदाचित एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं असतं. कारण जेव्हा गटनेता कोणाला करायचं, प्रमुख म्हणून कामकाज कोण पाहणार असा प्रश्न निर्माण व्हायचा तेव्हा एकनाथ शिंदेंकडेच जबाबदारी दिली जायची," असं अजित पवार म्हणाले. 


"अधुनमधून काही गोष्टी कानावर येत होत्या. एकनाथ शिदेंनी काही आमदारांची बैठक घेतल्याचं कानावर येत असे. मग आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की ते फोन करायचे. तेव्हा ते आपण आपल्या घरी साताऱ्यात आहे असं सांगायचे. पण हळूहळू ते साठत गेलं असावं. नगरविकास खात्यात त्यांना पूर्ण मुभा मिळाली नाही असं वाटलं असावं," अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले "कोणासोबतही काम करताना एका दिवसात हे घडत नाही. थोडं घडत जातं आणि नंतर स्फोट होतो".


पहाटेच्या शपथविधीचा निर्णय कोणी घेतला होता? असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी बोलण्यास नकार दिला. "या विषयावर मी बोलणार नाही. मी माझ्या मतावर ठाम असतो. कोणी कितीही विचारलं तरी मला त्यावर बोलायचं नाही," असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.