Nilesh Rane on Ajit Pawar: कोकणात (Konkan) मुसळधार पाऊस पडत असून वाशिष्ठी नदीने (Vashishthi River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचा फटका चिपळूण (Chiplun) शहराला बसत असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या या ट्वीटवर भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली असून, वाशिष्ठी नदीने असं म्हटलं आहे. 


अजित पवारांनी काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, "कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्यानं येत्या चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, मदतकार्य तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत". 



निलेश राणेंची ट्वीटवर प्रतिक्रिया


निलेश राणे यांनी अजित पवारांच्या ट्विटर प्रतिक्रिया दिली असून फक्त सूचना देऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून चिपळूणचा विषय सुटणार नाही असं म्हटलं आहे. पाऊस आल्यानंतर सूचना देऊन काही उपयोग नाही, पावसाळा नसताना चिपळूणसाठी नियोजन आणि काम दोन्ही गरजेचे आहे असा सल्ला त्यांनी दिला आहे. 



"फक्त सूचना देऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून चिपळूणचा विषय सुटणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार श्री शेखर निकम हे तिथे निवडून आले आहेत आणि सध्या ते तुमच्या गटात आहे, वाशिष्ठी नदीचा गाळ आणि कोयना धरणाचं अवजल या दोन कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होते, जोपर्यंत या दोन विषयांचा विचार होत नाही तोपर्यंत दरवर्षी चिपळूणला हीच परिस्थिती सहन करावी लागते. पाऊस आल्यानंतर सूचना देऊन काही उपयोग नाही, पावसाळा नसताना चिपळूणसाठी नियोजन आणि काम दोन्ही गरजेचे आहे," असं निलेश राणे म्हणाले आहेत. 


अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारण्याधी निलेश राणे यांनी अनेकदा जाहीर टीका केली आहे. तर अजित पवारांनीही त्यांना प्रत्युत्तरं दिली होती. पण आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने निलेश राणे यांचे सहकारी झाले आहेत. त्यामुळे टीकेची धार कमी झाली आहे.