दीपक भातुसे, मुंबई : राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. दुधाच्या पिशव्यांसह सर्व प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांवर डेअरींनी पर्याय शोधावा असे आदेश देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबईत २९ ऑगस्ट रोजी प्लास्टिक कचऱ्यामुळे मुंबई तुंबल्याचे समोर आल्याने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची गुढीपाडव्यानंतर काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.


प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांच्या उत्पादनाला देणार प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कापडी पिशव्या निर्मितीचे काम महिला बचत गटांना देणार असून यासाठी बचत गटांना अनुदान देखील देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तरतुद करण्यात येणार आहे. नोटबंदीसारखी प्लास्टिक बंदी नाही, लोकांना तयारीसाठी वेळ दिला. प्लास्टिक उद्योगाचा विरोध झाला तरी बंदी मागे घेणार नाही. प्लास्टिक उद्योगांना कागदी-कापडी पिशव्यांच्या निर्मितीकडे वळावे असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.


यापूर्वी ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर होती बंदी होती. आता सरसकट बंदी लागू करण्यात येणार आहे. काही देशात प्लास्टिक वापरण्यावर बंदी आहे. 2005 साली राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्लास्टिक उद्योजकांचा विरोध आणि राज्यात उडालेला गोंधळ लक्षात घेता सरकारने नंतर ही बंदी मागे घेतली होती.