कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता गावागावात सरपंचपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे काठावर बहुमत असणा-या ग्रामपंचायतींमध्ये काही ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावगाड्याचं राजकारण तापलं 


ग्रामपंचायतीमध्ये सत्ता एकाची आणि आरक्षित झालेल्या सरपंचपदाचा उमेदवार दुसऱ्या गटाचा असं चित्र, कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांत पाहायला मिळत आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला सुरवात झाली आहे. भुदरगड तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतीमध्ये हीच स्थिती आहे. 


एवढ्यावरच न थांबता विरोधी गटाचा सरपंच निवडून आला तर त्याला राजीनामा द्यायला लावण्याची व्यूहरचनाही आतापासूनच आखली जात आहे. यावर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना काय अजब सल्ला दिला आहे.


ग्रामपंचायत निवडणूका संपल्या पण सरपंच होणे बाकी आहे. त्यामुळे काय आता तुम्हाला पळवापळवी करायची आहे ते करुन घ्या आणि एकदाचा सरपंच बनवुन टाका. असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.


थोडक्यात गावगाड्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सरपंच आणि उपसरपंचपद निवडणुकीत त्याचीच प्रचिती येणार आहे.