अनिरुद्ध दवाळे, झी २४ तास, अमरावती: विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंच्या पुढाकारानं राज्यभरात तिसरी आघाडी निर्माण करण्यात आलीये.. मात्र, त्यांच्या प्रहार पक्षात बिघाडी झाल्याचं चित्र आहे.


 राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला भिडू बच्चू कडू अशी अमरावतीत बच्चूभाऊंची ओळख... पण याच बच्चूभाऊंचा भिडू पळालाय. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडलीय. महाराष्ट्रात सत्तापालट करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या बच्चूभाऊंना त्यांच्याच साथीदारानं चकवा दिलाय. राजकुमार पटोलेंनी बच्चू कडूंच्या प्रहारची साथ सोडलीये. प्रहारची बॅट टाकून लवकरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत.


बच्चू कडूंकडून मोठा पलटवार करण्याचा इशारा


मुख्यमंत्र्यांचा गणपती करण्याची भाषा करणाऱ्या बच्चू कडूंना हा मोठा धक्का मानला जातोय. या धक्क्यातून न सावरलेल्या बच्चू कडूंनी मोठा पलटवार करण्याचा इशारा दिलाय. आमदार राजकुमार पटेल यांनी धारणीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.. या मेळाव्याच्या बॅनरवरून प्रहार पक्षाचे नाव आणि बच्चू कडू यांचा फोटो काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला होता.राजकुमार पटेलांच्या सोडचिठ्ठीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही पटेलांसह महायुती सरकारवर निशाणा साधला..


कोण आहेत राजकुमार पटेल?


राजकुमार पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. माजी कॅबिनेट मंत्री स्वर्गीय दयाराम पटेल यांचे राजकुमार पटेल हे पूत्र आहेत. 1999 मध्ये भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार झाले आहेत. 2004 मध्ये दुस-यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले.2009 आणि 2014 मध्ये मेळघाट मतदारसंघातून पराभूत झाले.मेळघाटमधून 2019 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिकीटावर आमदार झाले. 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहारला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.


धक्क्यातून कडू कसे सावरणार?


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिस-या आघाडीसाठी पुढाकार घेतला, पण त्याआधीचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंच्या एकमेव साथीदाराला पळवलं.. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना आपल्याचं जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय.. या धक्क्यातून कडू कसे सावरतात हे निवडणुकीनंतरच पाहायला मिळणार.