नाशिक : काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीला एकमेकांशी युती करायची आहे. मात्र काँग्रेस आरएसएसबाबत आपली भूमिका जाहीर करत नसल्याने आघाडीची बोलणी फिसकटली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एमआयएमशी संगत करून भविष्यात वंचितांना सत्तेत आणण्यासाठी आपला लढा सुरूच राहील असं आंबेडकर यांनी मालेगाव येथील मेळाव्यात म्हटलं आहे. आंबेडकर यांनी लोकसभेच्या धुळे मतदार संघासाठी वंचित आघाडीच्यावतीने इंजिनिअर कासमी मोहम्मद कमाल हाशमी यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी मालेगावच्या कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांचा पक्षनिधी आंबेडकर यांच्याकडे सुपुर्द केला. या सभेलाही खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अनुपस्थिती खटकणारी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली होती. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघाला नव्हता. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर म्हटलं होतं. पण आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं. संघाने देशात समांतर व्यवस्थापन राबवले आहे, त्याऐवजी घटनात्मक व्यवस्थापन असावे अशी आमची मागणी असल्याचं आंबेडकरांनी तेव्हा म्हटलं होतं. घटनात्मक व्यवस्थापनाबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका असेल तरच चर्चा पुढे सरकेल असंही त्यांनी नमूद केलं होतं.


याआधी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत निवडणुका लढवणार असल्य़ाची घोषणा केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. असंही त्यांनी म्हटलं होतं. पण काँग्रेसशी युती झाली तरी आम्ही एमआयएमला सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. शरद पवार सेक्युलर आहेत पण त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाणं मंजूर नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.