मुंबई / पुणे : Rain News Update : राज्यात आठवडाभर चांगला पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. दरम्यान, आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (Rain Update) तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाच्या सरी कोसळणार असून  राज्यात पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज आहे. (Rain in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोसमी पावसासाठी पोषक असलेले वातावरण आणि कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. मोसमी पावसासाठी पोषक असलेली ही स्थिती हळूहळू क्षीण होत आहे. त्यामुळे पावसाचा जोर घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


काल गुरुवारी मुंबईसह कोकणात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरसह काही भागात, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला, अमरावती आदी भागांत हलक्या सरींची नोंद झाली. 


पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.