मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या वाट्याला आलेल्या आमदारकीवरुन त्यांना चांगलाच टोला लगावला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि राज्यातील शेकऱ्यांपुढे असणारं युरियाच्या कमी पुरवठ्याचं संकट या गोष्टी अधोरेखित करत आमदार झाल्यावरच शेकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचं दिसतं असा टोला पाटील यांनी लगावला. ज्यानंतर आता राजू शेट्टी यांनी ट्विट करत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चंद्रकांत दादा तुमच्या डोक्यामध्ये नेहमी राजकारण असतं. राजकीय हेतूनेच कधी  काळी तुम्ही मला विष्णूचा अवतार  म्हटलं होतं. माझ्या डोक्यात मात्र फक्त शेतकरी आणि शेतकरीच असतो. म्हणूनच केंद्र सरकारने दहा हजार टन आयातीचा निर्णय घेता क्षणी, मी १० जुलै रोजीच ट्वीट करून पंतप्रधानाच्या लक्षात आणून दिल होत. २१ जुलैला मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय तुम्हाला खरोखर शेतकर्यांचा कळवळा असेल तर या आंदोलनात सामील व्हा', असं ट्विट शेट्टी यांनी केलं. 


पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतेवेळी शेट्टी यांनी आपल्याच काही ट्विटचा संदर्भ देखील जोडला. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावरुन राज्यातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये पेटलेलला हा संघर्ष पुढं कोणत्या वळणावर पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



 


दरम्यान, दूध दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची महत्वपूर्ण घोषणा राजू शेट्टी यांनी केली