Kokan Rain Update :  कोकणात पावसाचा कहर पहायला मिळत आहे.  दापोली तालुक्यात साखलोळी इथे डोंगर खचल्याची घटना घडली आहे. डोंगराची माती खाली येतानाचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डोंगर खचल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमध्ये सध्या दरड किंवा रस्ता खचण्याच्या घटना घडत आहे. जोरदार पावसामुळे खेडच्य़ा शिवतर गावातील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता एका ठिकाणी खचून तो पूर्ण वाहून गेला आहे. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. 



गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचला


रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचू लागला आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाचेरी सडा गावाजवळील डोंगर खचू लागल्यानं या डोंगरालगतच्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दरम्यान या भूस्खलनामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी टाकीही खचली. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागतो. डोंगर खचू लागल्यानं गावक-यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.  


वाशिष्टी नदीच पाणी काल चिपळूण बाजारात शिरलं


वाशिष्टी नदीच पाणी काल चिपळूण बाजारात शिरलं होतं. आता मात्र पूर ओसरल्याचं दिसून येतंय. काल चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली होतं. आता मात्र पूर ओसरलाय. पुरामुळे चिखल झालाय. तो साफ करण्याचं काम सुरुय. 


कराड चिपळूण रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलं


साता-यातील कोयना, पाटण भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कराड चिपळूण रस्त्यावरील काही दुकानांमध्ये पाणी शिरलं. तर पाटण बस स्थानकातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीतदेखील झपाट्यानं वाढ झालीय. 24 तासात कोयना धरणाची पाणीपातळी 4 टीएमसीनं वाढलीय. धरणात सध्या 40.43 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय.


मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला येलो अलर्ट जारी


मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत सातत्यानं ढगाळ वातावरण असल्यानं दिसून येतंय. अधूनमधून पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस बरसतोय. दरम्यान येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.