नंदुरबार :  शहीद मिलिंद खैरनार यांचं पार्थिव आज सकाळी चंदीगडहून त्यांच्या मूळगावी आणण्यात येत आहे.आज सकाळी चंदीगडच्या वायूसेना स्टेशनमध्ये शहीद मिलिंद खैरनार या शूरवीराला अंतिम सलमी देण्यात आली.  यांचं शेवटचे पोस्टिंग चंदीगडमध्ये होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदीगडहून वायूसेनेच्या एका खास विमानानं त्यांना ओझरच्या वायूसेना तळावर आणण्यात येणार आहे. तिथून त्यांच्या नंदुरबारमधल्या मूळ गावी हे पार्थिव नेले जाणार आहे. चंदीगडमध्ये वायूसेनेच्या जवानांनी खैरनार आणि त्यांच्यासोबत शहीद झालेले निलेश कुमार नयन यांना सलामी देतेवेळी त्यांचे कुटुंबियही उपस्थित होते. खैरनार यांच्या पत्नीला यावेळी शोक अनावर झाला होता. 
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संरक्षण खात्यानं एक स्पेशल फोर्स मुंबईत रवाना केली होती. यात मिलिंद खैरनार यांचाही प्रामुख्यानं समावेश होता. एवढंच नव्हे तर नरीमन हाऊसमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली होती. आणि त्यांच्या या शौर्याचा त्यांच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे. मिलिंद यांचे आई-वडील मोठ्या अभिमानानं त्यांची ही शौर्यगाथा ऐकवतात. मिलिंद खैरनार हे 15 वर्षांपासून सैन्य दलात सेवा बजावत होते. मिलिंद यांची चंदीगडमध्ये पोस्टिंग होती.


सहा महिन्यांसाठी त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यातल्या अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता. मात्र आज दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं.