मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांसाठी राष्ट्रवादीची खलबतं सुरु आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आज संध्याकाळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक होणार आहे. माढ्यातून शरद पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना आग्रह केला आहे. तर ठाण्यातून गणेश नाईकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उद्या राष्ट्रवादीच्या संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवार यापूर्वी २००९ मध्येही माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. २००९ पासून २०१९ पर्यंत माढा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. शरद पवार माढ्यातून लढणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पवारांच्या संभाव्य उमेदवारीचे माढ्यातही पडसाद उमटू लागले आहेत. याआधी पवार बारामतीसारखी माढ्यात विकासगंगा आणतील असे मतदारांना वाटले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत तसे काहीही बदल होताना दिसले नाहीत, असे येथील जनतेच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. विकासकामांना प्राधान्य न मिळाल्याने जनता नाराज आहे.


शरद पवारांनी केळी संशोधन केंद्राचं आश्वासन दिले होते. शिवाय जर्सी गाय पैदास केंद्र माढ्यात आणू असेही सांगितले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर पवार यांना या सगळ्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप माढ्याचे मतदार करत आहेत. याबात शेतकरी नाना जगताप, नवनाथ कदम यांनी तशी नाराजी व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांत पवारांनी माढ्याकडे हवे तसे लक्षच दिले नाही. त्यामुळे पवारांनी माढा मतदारसंघातून उमेदवारीच घेऊ नये, असे इथल्या शेतकऱ्यांना वाटत आहे.


२००९ मध्ये माढ्यातील जनतेनं पाच लाख ३० हजार मते पवारांच्या पारड्यात टाकली होती. पवारांविरोधात तुल्यबळ उमेदवार दिल्यास यंदा पवारांना एवढी मते मिळतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.