Governor Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना माफीही मागावी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद उफाळून आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली होती.


त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या एका नेत्याने राज्यपालांवर निशाणा साधला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा उल्लेख घरगडी म्हणून केला आहे.


भगतसिंग कोश्यारी यांच्या महाराष्ट्राच्या विरोधातील वक्तव्यावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे.


उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहूनही कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. तसेच अधिवेशन सुरू असतानाच संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.


तसेच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबतही भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे. देशात भाजपची दडपशाही सुरू आहे. प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.