अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात विवाहाच्या दिवशीच 25 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने घेतला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या दिवशी तरुणीचे विवाह होणार होता. मात्र त्याआधीच तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन दिवसांपूर्वीच तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यानंतर विवाहाच्या दिवशीच तरुणीने आत्महत्या केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर शहरातील ओम नमः शिवाय नगर, कुमठे रोड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. विवाहाच्या काही तास आधीच तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील काही युवक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप या तरुणीने केला होता. याबाबत शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनला 15 डिसेंबर रोजी तक्रारीचा अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. संबंधिक युवकांकडून तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज पाठवल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. तसेच मृत तरुणीचे फोटो अश्लिलरित्या एडिट करून संबधित युवकांनी ते होणाऱ्या नवऱ्याला पाठवले होते.


सलमान शेख, वसीम शेख , समीर शेख यांच्यासह इतर 2 - 3 जणांनी मिळून माझ्या मुलीचा आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे असा आरोप तरुणीच्या वडिलांनी  केला आहे. विवाह मोडण्याच्या धास्तीने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. रविवारी रात्री घरी हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला होता. मात्र अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या भीतीने तरुणीने पहाटेच्या सुमारास विवाहाआधीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


"ती नालायक माणसं आहेत. माझ्या मुलीला त्रास देऊ नका असे सांगितले होते. मात्र त्यांनी मला धमकी दिली. सलमान शेख, वसीम शेख , समीर शेख यांनी माझ्या मुलीला धमकी दिली, तिच्या होणाऱ्या पतीला धमकी देऊन तिचं लग्न मोडलं. यामुळे ती खचली होती. पोलीस ठाण्यातही यांना अटक करा असे सांगितले होते. ती उच्चशिक्षित होती. तिचं आयुष्य संपवलं. चांगल्या पित्याचे काम मी केले होते," असे मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितले