पुणे : कोरोना लॉकडाऊनवरुन प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, सगळं काही सुरू करा. आमचा अंत पाहू नका, आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका. कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं. रामभरोसे थांबवावं, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत. त्यामुले कोविडचा परिणाम आहे का नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले, यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले. मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली. केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 


अशा परिस्थितीमध्ये लोकांचे हाल कधी थांबणार? दुकानं कधी उघडणार? एसटी बस कधी सुरू होणार? राज्यात महापुराचं संकट येऊ घातलंय, कोविड कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? ५ टक्के लोकांना अधिक धोका आहे, असं असताना ९५ टक्के लोकांना वेठीला का धरता? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 


कोरोनाच्या काळात परीक्षा न घेता पास करणं चुकीचं आहे. कोविडमुळे पास झाला, असे व्हायला नको. यावर्षी नाही, पुढच्यावर्षी परीक्षा घ्या, पण घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.