मुंबई  : यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. असे केल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. खाजगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनची मागणी राज्यभरातून होतेय. याची आग्रहाची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. त्याची किंमतही कमी ठेवावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इंजेक्शन्स फायदेशीर आहेत. तसेच राज्य सरकारचा हेतू स्वच्छ आहे. आम्हाला काहीही लपवायचे नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिले. पाचशे व्हेंटीलेटरची मागणीही पंतप्रधनांकडे करण्यात आलीय.



कोरोना चाचणीचे दर आम्ही दोन दिवसांपूर्वी निश्चित केले. त्यानुसार हे दर 
२ हजार २०० आणि २ हजार ८०० इतके दर केले आहेत. पण जे थेट लॅबमध्ये जातात त्यासाठी २ हजार ८०० रुपये आकारले जातात. थेट रूग्ण लॅबमध्ये चाचणीसाठी जात असतील तर २ हजार ५०० रुपये घ्यावे असे त्यांनी म्हटले. 


मुंबईत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही अशी तक्रार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये ५ ते १० रुग्णवाहिका आम्ही ठेवत आहोत. तरी १९१६ किंवा वॉर्ड ऑफिसच्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी करावी. खाजगी रुग्णवाहिकेची मागणी करू नये असे आवाहन टोपे यांनी केले. 


सर्व कोरोनाचे रिपोर्ट एका ठिकाणी येतील, नंतर ते वॉर्ड निहाय पाठवले जातील.
ज्या पॉझिटिव्ह रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांना खाजगी रुग्णालयांनी दाखल करून घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी विशेष लक्ष ठेवणार आहेत.