Success Story: आई वडिलांसोबत पोलपाट लाटणं विकलं, कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणून काम केलं. घरची परिस्थिती तशी बेताची. पण त्याने हार मानली नाही. आता तो महाराष्ट्र पोलीस म्हणून रुजू होतोय. संगमनेर जिल्हा अहमदनगरमध्ये राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. केवल हा संगमनगरच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडे बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवल घरी 3 भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. त्यात केवल हा सर्वात लहान मुलगा आहे. घरच्या परिस्थितीमुळे त्याचे अभ्यासात मन रमत नव्हते. जवळच्या सिद्धार्थ महाविद्यालयात शिकताना केवल 2008 ला दहावी नापास झाला. ऑक्टोबरला बसला पण पुन्हा नापास झाला. त्यानंतर पाच वर्षानी 2013 ला दहावीची परीक्षा दिली. त्यात पास झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची होती. आई वडिलांना लाटणे, पोलपाट, चौरंग बनवायला मदत करायचा. घरातले दोन भाऊ आणि आई वडिल असे सर्व मिळून हे काम करायचो. नापास झाल्यावर त्याला खूप वाईट वाटल. पण आता मागे हटायच नाही हे त्याने ठरवंल आणि अकरावीला खूप मेहनत घेऊन 78 टक्के मिळवले,


अकरावी बारावीला श्रमिक महाविद्यालय संगमनेर, दोन्हीवेळेस मुलांमधून पहिला आला. अकरावीला भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यातून दुसरा आला. बारावीदेखील विविध स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक आला. बारावीला मतदान जनजागृती स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक आला. बारावीत त्याला 76 टक्के गुण मिळाले.



दरम्यान त्याने पोलीस भरती परीक्षेची तयारी सुरु केली. 2018 ला पहिली पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्यावेळी 176 चा कट ऑफ लागला पण त्याला 170 गुण होते.  परीक्षेत यश मिळाले नाही पण परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम काय असतो हे समजलं. 2019 मध्ये पूर्ण तयारी केली पण तेव्हा लॉकडाऊन लागला. त्यानंतर त्याने अभ्सास बंद केला आणि बियर बारमध्ये वेटरचे काम केले. लहानपणापासून तो लग्न समारंभात वाडपीचे काम करत आलाय.


लॉकडाऊनमुळे 2019 ची भरती 2021 ला झाली. शेवटचे 3 महिने अभ्यासाला मिळाले. त्यावेळी पेपर कठीण गेला. लेखी परीक्षेत 68 गुण मिळाले. पण मेरीट 74 ला बंद झाली. दरम्यान जानेवारी 2022 पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. सकाळी उठून मैदानी सराव, त्यानंतर दुपारी अॅकेडमी, संध्याकाळी अभ्यास आणि रात्री घरच्या लाटणी पोलपाट बनवण्यावर लक्ष द्यावे लागायचे.


पण काम पूर्ण बंद करुन त्याने पोलीस भरतीच्या अभ्यासवर लक्ष दिलं. सप्टेंबरमध्ये पोलीस भरती निघाली. त्यावेळी फॉर्म भरली. नगरपालिकेच्या लायब्ररीत अभ्यास करण्याचा निर्णय त्याने घेतला. पण तेथे भरायला पैसे नव्हते म्हणून लायब्ररीतून बाहेर काढल्याचा प्रसंग त्याने झी 24 तासशी बोलताना सांगितला. 


केवल रात्री 3 वाजेयपर्यंत अभ्यास करायचा. हाती घेतलेला विषय पूर्ण झाल्याशिवाय ठेवायचा नाही. घरुन 10 रुपये घेऊन अभ्यासाला बाहेर पडायचा. त्यात 2 बिस्किट पुडे घेऊन जायचा आणि तोच नाश्ता म्हणून खायचा.


यावेळचा पोलीस भरतीचा पेपर कठीण होता. पण माझा सराव चांगला झाला होता. ग्राऊंडला 36 आणि पेपरला 81 असे पूर्ण 117 गुण मिळाल्याचे त्याने सांगितले.


17 मेला संध्याकाळी 7 वाजता उत्तीर्णांची लिस्ट आली. एका मित्राने फोन करुन तूझं नाव आलंय असं सांगितला. त्याने घरच्यांनाही सांगितले. तितक्यात आईचा मला फोन आला. आई मी पोलीस झालो असे मी तिला फोनवर सांगितले. आईला खूप आनंद झाला. तिला हसू की रडू हे कळत नव्हते. आईने वेळप्रसंगी वडिलांशी भांडण करुन मला अभ्यासाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे या सर्वाचे श्रेय आईला असल्याचे केवल सांगतो.


पोलीस भरतीची तयारी करताना माझ्यावर कोणाला विश्वास नव्हता. पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि मेहनत करत राहीलो असे तो सांगतो.