बुलडाणा : शहरात कालपासून बेपत्ता झालेली तीन लहान मुले बंद कारमध्ये सापडलीत. मात्र, यात दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला झाल्याची बाब पुढे आली आहे. तर एक मुलगी जिवंत सापडली. तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंगणवाडीत गेलेल्या तीन बालकांचे बुलडाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी १५ जुलै च्या दुपारी १ वाजेदरम्यान घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शहरातील सीसीटीव्ही ची तपासणी केली. मात्र या बालकांचे थांगपत्ता लागलेला नव्हता तर १६ जुलैच्या रात्रीपासून गुरु पौर्णिमा लागत असल्याने हे अपहरण नरबळीसाठी झाल्याची चर्चा होती. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र आज ही मुले कारमध्ये आढळून आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला. मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही.


सुलतान चौका समोरील गवळीपुरा येथे एका घरासमोर एक लाल कार उभी होती. या कारजवळ जाऊन पोलिसांनी काचेमधून डोकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना काही हालचाल दिसली. पोलिसांनी काचेला ठोठावले असता मुलगी उठून बसली. त्यावेळी पोलिसांची खात्री पटली की, आतामध्ये लहान मुले आहेत. पोलिसांनी तातडीने कारचे दरवाजे उघडले असता. त्यात दोन मुले ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. दरम्यान, तिघांनाही उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी शेख साहिल शेख जमील आणि शेख अजीम शेख समीर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.