अमित जोशी,  नवी मुंबई : उलवे येथील विमानतळाच्या प्राथमिक कामाला सुरूवात झाली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारा वेळ लक्षात घेता डिसेंबर २०१९ ही नवी मुंबई विमानतळाची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे. 


दगड मातीचा उपयोग भराव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विमानतळावरील भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईत नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलं जाणार आहे. त्याच्या प्राथमिक कामाला सुरूवात झालीय. जमिनीचं सपाटीकरण हे त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. तसंच नदीचा प्रवाह बदलणे, भराव टाकणे ही मोठी कामंही त्यात आहे. पण त्यातलं सर्वात मोठं आव्हानात्मक काम आहे ते म्हणजे उलवे टेकडीची उंची कमी करण्याचं. यासाठी विविध क्षमतेचे स्फोट केले जात आहेत. यातून मिळणाऱ्या दगड मातीचा उपयोग भराव टाकण्यासाठी आणि विमानतळाची उंची वाढवण्यासाठी केला जात आहे. 


 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित 


नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक कामाला जरी सुरूवात झाली असली तरी विमानतळ भागामध्ये असलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. या विमानतळामुळे एकूण 3000 कुटुंब विस्थापीत होणार आहेत. मात्र कामाला सुरूवात झाली असली तरी अजून केवळ 250 कुटुंबच स्थलांतरी झाली आहेत. 750 कुटुंबांना स्थलांतराची तयारी दर्शवली आहे. मात्र 2000 कुटुंबियांचा विरोध कायम आहे. त्यामुळे डिसेंबर 2019 ची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे. 


स्थानिकांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष 


विमानतळाच्या कामाला सुरूवात झालीय. आता पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लागणं गरजेचं आहे. विमानतळ वेळेत पूर्ण होणं मुंबईसाठी आवश्यक आहेच पण इथल्या स्थानिकांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.