विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी इथल्या काशीनाथ दत्तू धारासुरे यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यात तीन चिमुरड्यांचा दुर्देवी अंत झाला आहे. तर महिला अत्यवस्थ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
शुक्रवारी रात्री काशीनाथ धारासुरे यांची पत्नी भाग्यश्री आणि त्यांची मुलं साधना (वय 6), श्रावणी (वय 4), नारायण (8 महिने) यांनी एकत्र जेवण केलं. मुलांना अंड खायचं असल्याने भाग्यश्री यांनी तीनही मुलांना अंड्याचा पोळा बनवून दिला. त्यानंतर रात्री हे सर्वजण झोपी गेले. पण सकाळी चौघांनाही अत्यवस्त वाटू लागलं. 


काही वेळातच तीनही मुलांचा एकामागोमाग एक मृत्यू झाला. आसपासच्या लोकांनी या चौघांनाही रुग्णालयात दाखल केलं, पण त्याआधीच तीनही मुलांचा मृत्यू झाला होता. तर या मुलांची आई मृत्यूशी झुंज देतेय. अंबेजोगाई इथल्या स्वाती रामानंद तीर्थ रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. 


या मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.